Sunday 21 April 2013

‘भागवत धर्म’


भागवत धर्म
              

          बुद्धिबळ हा इतिहासकाळापासून एक जगन्मान्य खेळ आहे. त्या खेळाचे स्वरूप लक्षात घेऊ. त्यातील सैनिक केवळ एक घर पुढे जातो. हत्तीस्वार समोर किंवा बाजूला सरळ जातो. राजा हा वास्तविक राजा असला तरी त्याच्या हालचालीला मर्यादा असते तर वझीर म्हणजे प्रधान मात्र कसाही जाऊ शकतो. प्रत्येकजण आपल्या स्वभावाप्रमाणे जबाबदारीप्रमाणे व खेळाच्या आवश्यकतेनुसार पण नियमानुसार वागतात. बुद्धिबळात प्राविण्य मिळवायचे असेल तर प्रत्येकाचे स्वभाव व नियम (शास्त्र) माहित करून घेऊन त्यानुसार प्रसंगावधान राखून खेळणे आवश्यक होय.
           मानवी जीवनाचे तसेच नाही का ? जीवनरूपी खेळातील प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, स्वधर्म वेगळे, काळानुसार स्वधर्म बदलतात व त्यानुसार जबाबदार्‍या ठरतात, शिवाय स्वधर्म हा शास्त्राला धरूनच असतो - मनाला येईल तसे वागून चालत नाही.
           उदाहरणाने समजून घेऊ. अर्जुन रणभूमीवर गर्भगळीत झाला. त्याने युद्धाला नकार दिला. तो शिष्यभावनेने भगवंतांना शरण गेला. आता त्यावेळी भगवान त्याला आप-परभाव सोडून देऊन क्षत्रिय धर्माला अनुसरून आवश्यक अशा युद्धाचाच सल्ला दिला. पण समजा अर्जुनाच्या जागी दुर्योधन असता तर ? तो सुद्धा क्षत्रियच होता ना ? पण भगवंतांनी त्याला युद्ध कर असे न सांगता उलट युद्धापासून परावृत्तच केले असते. त्याला कारण म्हणजे त्याची बाजू शास्त्राला धरून नव्हती. युद्धाची गोष्ट बाजूला ठेवू. शरद ऋतुतील पौर्णिमेच्या रात्री गोकुळातील गोपी भगवान श्रीकृष्णाची बासुरी ऐकून, विरहाने व्याकुळ होऊन, आपला संसार त्यागून धावत धावत कृष्णापाशी आल्या. वास्तविक त्या सर्व जणी कृष्णावर पती या भावनेने प्रेम करण्याच्या हेतूने आल्या होत्या. पण मग कृष्णाने त्यांना त्यांचा पती-धर्म सांगून परत पाठवले का त्यांना उपनिषदातील वेदान्त समजावले नाही. त्या सर्व गोपी भगवंतांशी इतक्या एकरूप झाल्या होत्या की कृष्णाने त्यांचे कर्मबंधन नाहीसे करून त्यांना दिव्यदेही बनवले. भगवंतांच्या अवतार समाप्तीच्या वेळी त्यांच्या विरहाच्या कल्पनेने व्याकूळ होऊन त्यांच्या बरोबर जाण्याच्या हेतूने तो पण भगवंतांना शरण आला.
            अशा प्रसंगी भगवंतांनी त्याला सदेह वैकुंठला नेले का ? नाही. तसे करणे शक्य होते तरी त्यांनी त्याला भागवत धर्म सांगितला व त्याचा प्रसार करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली.
            विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवंतांनी ज्याला त्याला त्याच्या स्वभावाप्रमाणे-स्वधर्माप्रमाणे-शास्त्राला अनुसरून आणि निष्काम भावाने आचरण्याचा धर्म सांगितला.
           व्यासांनी वास्तविक याच धर्माला खूप प्रसार केला. ते काय म्हणत माहित आहे का ? व्यास म्हणत - सर्व जगाला मी हात वर करून उच्च स्वरात सांगत आहे की धर्माप्रमाणे आचरण करा. तुम्हाला अर्थ व काम मिळेल. पण तरी माझे कोणी ऐकतच नाही.वास्तविक यामुळे ते अस्वस्थ होते. आणि खरच आहे ना ! कारण अर्थ व काम हे काही धर्माचे फळ आहे का हो ? धर्माचे खरे फळ मोक्ष आहे आणि त्याच्या प्राप्तीचे साधन म्हणजे भक्तियुक्त भागवत धर्म. आणि त्याच्या प्रतिपादनासाठी मग त्या भागवताची रचना केली.
          या सर्वाचा अर्थ असा की मला माझा संसार-माझा व्यवसाय-माझ्या पुढील आव्हाने-माझ्या जबाबदार्‍या यासाठी स्वभाव जाणणे आवश्यक. त्यानुसार मग माझा धर्ज्ञ काय ते जाणून त्या संदर्भात मग शास्त्र काय सांगते ते अभ्यासून तद्नुसार समर्पण भावाने समाचर म्हणजे उत्तम प्रकारे कर्म करायला हवे. या सर्वांच्या एकत्रित स्वरूपालाच भागवत धर्मम्हटले असून तोच भागवताचा प्रतिपादित विषय आहे.